Health: या 6 गोष्टी तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे ते सांगतात


गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे मानसिक आरोग्य ह्या विषयाची जास्त मोकळेपणाने चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.

 

अनेक शारीरिक आजारांच्या मुळाशीसुद्धा मानसिक ताण आणि असंतुलन असते हे आता वैद्यकशास्त्राने मान्य केले आहे.

 

मात्र अनेक वेळा आपण आपल्या मानसिक आरोग्यात होणाऱ्या बिघाडांकडे दुर्लक्ष करतो. किंबहुना अनेक वेळा आपल्या हे बदल लक्षातही येत नाहीत. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते आणि मग त्यावर उपचार घेणे अधिक अवघड होतं जाते.

 

10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्ताने आपले मानसिक आरोग्य चांगले आहे का हे ओळखण्याचे महत्त्वाचे निर्देशक आपण जाणून घेणार आहोत.

 

1) भूक

योग्य वेळी आणि पुरेशी भूक लागणे चांगल्या मनस्वास्थ्याचे लक्षण आहे. ह्याउलट अन्नावरची वासना उडणे, अजिबात भूक न लागणे किंवा सतत खाई खाई सुटणे हे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे दर्शवतात.

 

खूप ताण असेल तर आपली भूक मरते.

 

डिप्रेशन किंवा चिंतारोग अशा आजारांमध्ये देखील आपल्या भूकेवर (appetite) परिणाम होतो. असे रुग्ण स्वतः हून खायला मागत नाहीत. त्यांची भुकेची जाणीव खूप कमी होते. समोर अन्न अनेक तास तसेच राहू शकते.

 

ह्याउलट mania किंवा स्किझोफ्रेनिया ह्यासारखे आजार झाले तर भुकेवर ताबा रहात नाही.

 

खूप ताण आला किंवा OCD सारखे आजार झाले तर ताण कमी करण्यासाठी जास्त खाल्ले जाऊ शकते.

 

कधी कधी, deaddiction ची प्रक्रिया सुरू असताना अनेक addicts चा आहार अचानक वाढू शकतो.

2) झोप

नियमित वेळेला आणि शांत झोप लागणे तसेच 7-8 तासांनंतर आपणहून जाग येणे आणि उठल्यावर ताजेतवाने वाटणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे.

 

निद्रानाश, अस्वस्थ झोप, रात्रभर झोपून उठल्यावरही थकवा जाणवणे, अति झोप येणे हे मानसिक रोगांचे निर्देशक असू शकतात.

 

प्रामुख्याने चिंता भेडसावत असेल तर निद्रानाश जडण्याची शक्यता वाढते. मनातल्या विचारांना नियंत्रित करता येत नसेल तर झोप लागत नाही.

 

काही कारणांमुळे किंवा मानसिक रोगामुळे जर व्यक्ती अतिउत्तेजित झाली असेल (उदा mania, drug deaddiction मुळे येणारी withdrawals, ADHD सारखे आजार) तर झोपेवर परिणाम होऊ शकतो.

 

डिप्रेशन किंवा असह्य ताण असेल तर झोपेची वारंवारता वाढते. हे रुग्ण सलग दिवसभर सुद्धा झोपून राहू शकतात. त्यांना उठून बसण्याचे किंवा खण्यापिण्याचेही भान राहत नाही.

3) विचारशक्ती

स्वच्छ आणि योग्य विचार करता येणे, समस्यांकडे वस्तुनिष्ठपणे पाहता येणे, त्यामुळे आलेल्या ताण तणावाचे योग्य संतुलित नियोजन करता येणे हे मानसिक स्वास्थ्य ठीक असल्याचर दर्शवते.

 

योग्य तिथे रिस्क घेण्याची आणि आपल्या कम्फर्ट झोन च्या बाहेर जाण्याची तयारी असणे हे मानसिक दृष्ट्या बलवान असल्याचे लक्षण आहे.

 

छोटे छोटे प्रश्न आले तर हात पाय गळणे, सततचा वैचारिक गोंधळ, आव्हानांपासून सतत पळ काढणे, वैचारिक आणि भौतिक कम्फर्ट झोन मधुन बाहेर पडायला घाबरणे, असुरक्षित वाटणे मानसिक असंतुलन दर्शवते.

 

घरात जर काही अप्रिय घटना घडली (उदा. काही गंभीर आजार, अपघात, अकाली मृत्यू, आर्थिक संकट इ.) तर काही माणसे सैरभैर होतात आणि आपली विचारशक्ती गमावून बसतात.

 

काही माणसे एकदम बधिर होऊन जातात. काही घडलंच नाही अश्या मनोभावानेमध्ये अडकतात.

 

ह्याउलट काही माणसे अश्या परिस्थितीत जास्त खंबीर बनतात आणि परिस्थितीचा सामना करतात. आपल्या मनाचा तोल कोणत्याही परिस्थितीत जाऊ न देणे आणि तरीही संवेदनशील असणे हे मानसिक दृष्ट्या निरोगी असल्याचे लक्षण आहे.

4) अपयश

अपयश पचवता येणे आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा प्रयत्न करणे तसेच यशाने हुरळून न जाणे संतुलित मानसिकता दर्शवते.

 

साध्या अपयशाने देखील खचून जाणे, प्रत्येक अपयश हे व्यक्तिगत मानणे किंवा यश मिळाल्यावर वाहवत जाणे हे मानसिक दृष्ट्या अप्रगल्भ असल्याचे लक्षण आहे.

 

पौगंडावस्थेतील मुलांमध्ये हे लक्षण खूप जास्त दिसून येते. परीक्षेतले, किंवा प्रेमातले अपयश, एवढेच नव्हे तर सध्या मागण्यांना आलेले नकार पचवता न येणारी अनेक मुले अपयशाच्या गर्तेत जातात. अशा मुलांमध्ये डिप्रेशन सारखे आजार खूप जास्त आढळून येतात. Inferiority complex मुळे ही मुले यशाचे दरवाजे बंद करून घेतात

 

ह्याउलट यशाने हुरळून जाऊन स्वतः ला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणाऱ्याना narsissism जडण्याची शक्यता बळावते. स्वतः बद्दल अवास्तव कल्पना असणाऱ्या व्यक्तींना grandeur सारख्या personality disorders असू शकतात.

 

5) नात्यांचे नियोजन

कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत निरोगी नातेसंबंध टिकवता येणे हे संतुलित मानसिकता दर्शवते.

 

नात्यांची गरज ओळखता येणे, प्रत्येक नात्याला त्याच्या गरजेप्रमाणे योग्य प्रतिसाद देता येणे, नात्यातले छोटे छोटे गुंते सोडवण्याची क्षमता ठेवणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

 

आपल्या माणसांशी सतत कुरबुरी, हेवेदावे, इगो, इतरांशी पटवून न घेता येणे, सतत इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे, माफ करण्याची किंवा सोडून देण्यात असमर्थता आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक आहेत.

 

Broken families मधून आलेल्या मुलांना पुढे जाऊन नाती जोडणे कठीण जाऊ शकते. अति सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मुलांना देखील नाती जोडताना काही समस्या येऊ शकतात.

 

ज्या मुलांनी लहानपणी शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक अत्याचार सहन केलेले असतात ह्यांपैकी काही मुले पुढे जाऊन अत्याचारी सहचर किंवा पालक होण्याची शक्यता असते.

6) एकटेपण

समाजात मिसळून राहणाऱ्या आणि स्वतः चे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक ह्यांच्याशी चांगले संबंध असणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी हितकारक असते. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि आपले मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी आपल्याला माणसांची गरज असते.

 

सतत एकटे राहणाऱ्या, माणसांपेक्षा जास्त यंत्रांमध्ये रमणाऱ्या, आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ न घालवणाऱ्या व्यक्तींनाही मानसिक आजार जडण्याची शक्यता अधिक असते.

 

सतत काम करणे, कधीही सुट्टी न घेणे, पूर्ण वेळ घरात राहणे, कला, पर्यटन, क्रीडा, वाचन किंवा इतर छंदाची आवड नसणे मानसिक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

 

आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे आढळून येत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. गरज असेल तर अश्या व्यक्तींसाठी (अगदी लहान मुलांसाठी सुद्धा) मानसोपचार तज्ञ, समुपदेशक किंवा अगदी मनोविकारतज्ञाची सुद्धा मदत घ्यायला हवी.

 

योग्य वेळी मदत मिळाली तर ह्यापैकी अनेक जण आनंदी आणि निरोगी मानसिक आयुष्य जगू शकतात.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *